शोध न्यूज : पस्तीस प्रवाशांना घेवून निघालेली राज्य परिवहन महामंडळाची कुर्डूवाडी - वैराग एस. टी . बस सुर्डी - मालवंडी दरम्यान पलटली आणि प्रवाशांत एकच गोंधळ उडाला.
कुणी ऐकेल का?
राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास देखील अलीकडे सुरक्षित राहिला नसून अक्कलकोट तालुक्यात अलीकडेच एस टी बसचा मोठा अपघात झाला होता तर मोहोळ तालुक्यात धावत्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाने शेत शिवारात बस घातली आणि प्रवाशांचे प्राण वाचवले होते. आज पुन्हा कुर्डूवाडी (माढा मार्गे) - वैराग बस धावत असताना उलटली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून काही प्रवासी किरकोळ स्वरुपात जखमी झाले आहेत. खराब रस्ता आणि ऊसाची वाहतूक करणारी वाहने या रस्त्यावर असल्यामुळे एस टी बसचा वेग अत्यंत कमी होता. अत्यंत हळू वेगात ही बस जात असताना रस्त्याच्या बाजूला पलटली त्यामुळे प्रवाशांत एकच गोंधळ उडाला परंतु ही बस हळूहळू पलटी झाल्यामुळे जवळपास ३५ प्रवासी असतानाही जीवितहानी झाली नाही.
बस उलटू लागली तेंव्हा प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले आणि आरडओरडा सुरु झाला. या अपघातात काही प्रवासी किरकोळ स्वरुपात जखमी झाले आहेत. बस रस्त्यावरून जात असतांना बसचा स्टेअरिंग रॉड अचानकपणे तुटला आणि बस एका बाजूला जाऊ लागली अशी माहिती बस चालकाने दिली आहे. स्टेअरिंग रॉड तुटल्याचे लक्षात येताच बसवर नियंत्रण ठेवून ती थांबविण्याचा प्रयत्न करीत असतानाच बसचा एक टायर रस्त्याच्या खाली गेला आणि बस हळूहळू एका बाजूला पलटली अशी माहिती चालकाने दिली आहे. प्रवासी देखील चालकाला दोष देत नव्हते ते हा एक अचानक घडलेला अपघात होता असे प्रवासी सांगत होते.
या अपघाताने पुन्हा एकदा राज्य परिवहन महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. धावत्या बसचा ब्रेक निकामी होतो, चालू बसचे स्टेअरिंग तुटते आणि अपघात होतो. (Kurduwadi - Vairag Pravashi ST. The bus overturned) अशा घटनामुळे बसची देखभाल व्यवस्थित होत नसल्याचाच मुद्दा ऐरणीवर येत आहे. अशा बस प्रवाशांच्या जीवावर उठू शकतात याबाबत मात्र प्रवाशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !