शोध न्यूज : भाऊबिजेसाठी बहिणीला भेटायला निघालेल्या भावाच्या गाडीचा अपघात होऊन लागलेय आगीत गाडीसह सोन्याचाही कोळसा झाल्याची घटना समोर आली आहे.
दिवाळीच्या आनंद आणि उत्साहाच्या दिवसांत राज्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. पुण्यासह विविध शहरात आगीच्या घटना घडलेल्या असून दिवाळीचे फटाके या आगीचे कारण ठरले आहेत. ऐन दिवाळीत आगीच्या संकटाचा सामना करावा लागला असून या आगीमुळे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर आगीचे विरजण पडले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात अपघात होऊन वॅगनार कारला मोठी आग लागली आणि यात गाडीसह सोने देखील जळून गेल्याची घटना घडली आहे, सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. वेळीच प्रसंगावधान राखले गेल्याने चार जणांचा जीव बचावला आहे.
भाऊबीजेसाठी भाऊ आपल्या कुटुंबासह बहिणीकडे निघाला होता. पुण्याहून दापोलीकडे वॅगनार कार मधून निघालेल्या भावाच्या गाडीला रस्त्यातच अपघात झाला. मंडणगड रस्त्यावर मध्यरात्रीच्या वेळेस या बर्निंग कारचा थरार अनेकांनी अनुभवला पण कुणी काहीच करू शकतले नाहीत. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आंब्याच्या झाडावर जाऊन ही कार आदळली आणि लगेच कारने पेट घेतला. अपघातात जीवितहानी झाली नाही पण आगीमुळे मात्र मोठे संकट ओढवले गेले होते. गाडीला आग लागताच पती पत्नी आणि त्यांची दोन लहान मुले घाईघाईने गाडीतून खाली उतरली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला गेला.
गाडीने एकदम पेट घेतला आणि काही क्षणात ही आग भडकून पूर्ण गाडीला लपेटले. गाडीतून खाली उतरण्यास थोडासा जरी विलंब झाला असता तर लहान मुलांसह चौघांचे प्राण संकटात आले असते. वेळीच चौघेही गाडीच्या बाहेर पडले परंतु गाडीतील समान बाहेर काढण्याची संधी देखील त्यांना मिळाली नाही. (Accidental fire, car with gold became 'coal')सदर गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. गाडीत एका डब्यात आठ तोळे सोने ठेवलेले होते, हे सोने या आगीत जळून, वितळून गेले त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे तथापि या घटनेत चौघांचे जीव वाचले हीच मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
आगीची दिवाळी !
यंदाच्या दिवाळीत विविध कारणाने आग लागण्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. काही आगी फटाक्यांमुळे लागलेल्या आहेत. पुण्यात ऐन दिवाळीत आगीच्या अनेक घटना समोर आल्या असून एका घटनेत दहा वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदाशिव पेठेतील एक हॉटेलला आग लागली आणि या आगीत दहा वर्षे वयाच्या मुलीचा मृत्यू झाला. मुंबईत फटक्याच्या एका ठिणगीने कापड गोदामाला आग लागली आणि शेजारच्या इमारतीतील रहिवाशांचे प्राण संकटात सापडले. घराघरातून नागरिक बाहेर पडले आणि आपले जीव वाचवले. कपड्याचे गोदाम मात्र पूर्णपणे जळून खाक झाले. पंढरपूर येथेही फटाक्यांमुळे मंदिर परिसरातील एका घराला आग लागली, पुणे, ठाणे, विरार, यवतमाळ अशी विविध शहरात आगीच्या अनेक घटना ऐन दिवाळीत घडल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !