शोध न्यूज : शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेल्या आमदार प्रकाश सुर्वे यांनी अत्यंत धक्कादायक आणि चिथावणीखोर वक्तव्य केले असून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना फोडण्याचे काम केल्यामुळे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकाना हे रुचले नसून बंडखोरांना गद्दार अशी उपमा देत या चाळीस आमदारांचा जोरदार निषेध करणे सुरुच आहे. बंडखोर आमदारांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी जीवापाड परिश्रम घेतले तेच आता विरोधात उभे राहिल्याने मतदार संघात या बंडखोरांना अडचणीचे ठरू लागले आहे. त्यातच युवा शिवसेनेचे प्रमुख राज्यात झंजावात निर्माण करू लागले आहेत. गद्दारांना क्षमा करायची नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे असे आवाहन ते करीत असून शिवसैनिकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभताना दिसत आहे.
बंडखोर आमदार गुवाहाटी मुक्कामी असताना शिवसैनिकांनी अनेक आमदारांच्या कार्यालयावर हल्ले करून तोडफोड केली होती. त्यानंतर देखील हा उद्रेक कायम असून पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. प्रत्येक बंडखोर आमदार हे आता कधीकाळी आपले समर्थक असलेल्या शिवसैनिकांचेच टार्गेट बनले आहेत आणि याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बंडखोर आणि शिवसैनिक यांच्यात मोठी दरी पडली असून परस्परांना आव्हाने - प्रतिआव्हाने दिली जात आहेत. यातच बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांनी मात्र अत्यंत धक्कादायक वक्तव्ये केली असून कायद्याच्या विरोधात त्यांनी आव्हान दिल्याचे समोर आले आहे.
"आपण गाफील रहायचं नाही, यांना यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसायचे नाही, कुणाचीही दादागिरी खपवून घ्यायची नाही, कुणी आरे केलं तर त्याला कारे करा ....ठोकून काढा .... प्रकाश सुर्वे इथे बसलाय ! हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा ... दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करून देतो. चिंता करू नका ! आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही पण आमच्या अंगावर आला तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही ! "
राज्यात बंडखोर आमदारांच्या आणि भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले असून आता राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी शिंदे -फडणवीस सरकारची आहे. परंतु सत्तेत असलेल्या गटातील मागोठाणे विधानसभा मतदार संघातील बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांनी अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य केले असून मिळवलेल्या सत्तेची नशा यातून बाहेर येताना दिसत आहे. "हात नाही तोडता आला तर पाय तोडा, दुसऱ्या दिवशी जामीन करून देतो, तुम्ही त्याची चिंता करू नका" असे अत्यंत धक्कादायक आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
या चिथावणीखोर वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक उदेश पाटकर यांनी आक्षेप घेतला असून त्यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका कार्यक्रमात केलेल्या या चिथावणीखोर भाषणाचा व्हिडीओ देखील पाटकर यांनी पोलिसांना दिला आहे. आमदार सुर्वे यांचे वक्तव्य अत्यंत प्रक्षोभक असून कायदा, सुव्यवस्था, लोकशाही आणि संविधान यांचे धिंडवडे काढणारे आहे. या वक्तव्याबद्धल आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला आहे.
आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याचा व्हिडीओ देखील आता व्हायरल होऊ लागला असून एखादा आमदार प्रतिस्पर्ध्याचे हात पाय तोडण्याचे आदेश जाहीरपणे आपल्या कार्यकर्त्यांना देत असल्याचे पाहून सर्वसामान्य देखील तोंडात बोट घालून हा व्हिडीओ पाहू लागले आहेत. (Break the legs, shocking orders of MLAs) प्रत्यक्ष छायाचित्रण असून ते पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, आता पोलीस गुन्हा दाखल करणार की नाही याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
उत्साह वाढविण्यासाठी !
आ. प्रकाश सुर्वे यांनी या विधानांचा इन्कार केला नसून आपण कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आपण तसे बोललो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे हे समर्थन कुणाला पटले नसून 'कार्यकर्त्यांनी अशाच उत्साहात काही केले आणि पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर तरुणाई भरडून जाणार आणि आमदारांचा 'उत्साह' गरीब तरुणांना महागात पडणार' अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
- अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !