मोहोळ : ऊसाची बिले साखर कारखान्यांनी वेळेत दिली नाहींत आणि शेतकऱ्याचा पोतराजा बनविला आहे त्यामुळे व्याजासह रक्कम मिळावी या आणि आणखी काही मागण्या घेवून शिरापूर येथील शेतकरी पोताराजाचा (Potaraj) वेष परिधान करून हलगी वाजवत पुण्याला निघाले आहेत.
अनेक साखर कारखान्यांनी (Sugar factory) शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप केले पण त्यांना बिले वेळेत दिली नाहीत, कित्येक कारखान्याने तर अजूनही मागील एफआरपी रक्कम दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते विस्कटली आहेत. कारखान्याच्या बिलावर ऊस उत्पादकांची सगळीच गणिते असतात. कष्टासह मोठा खर्च करून पिकवलेला ऊस कारखान्यांनी गाळप केला पण तरीही शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला नाही त्यामुळे वेगळ्याच आर्थिक कोंडीत शेतकरी सापडला आहे. कारखान्याच्या दारात हेलपाटे घातले, आंदोलने केली तरीही बळीराजाचा आक्रोश कुणाच्याच कानापर्यंत पोहोचला नाही. शेतकरी बांधवावर आलेल्या या परिस्थितीमुळे मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील शेतकरी आणि समाजसेवक अनिल आबाजी पाटील यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
साखर कारखान्यांनी शेतकऱ्याला पोतराजा केल्याने पोतराजाचा वेष परिधान करून पाटील हे चालत आणि हलगी वाजवत पुण्याच्या साखर आयुक्तांच्या भेटीला निघालेले आहेत. एफआरपीची रक्कम चौदा दिवसात मिळावी, मागील थकलेल्या रकमेवर पंधरा टक्के दराने व्याज द्यावे यासह अन्य मागण्या घेऊन ते साखर आयुक्तांना भेटणार आहेत. शिरापूर पासून पुण्यापर्यंत ते हलगी वाजवत पायी प्रवासाला निघाले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांना निवेदन देखील दिले आहे त्यामुळे या वेगळ्याच आंदोलनाची चर्चा होऊ लागली आहे. (Farmers in trouble, Farmer's journey to Pune on foot) त्याच्या या प्रवासामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी हे विषय पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
खिशात फक्त ३० रुपये
शेतकऱ्यांच्या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यापर्यंत चालत निघालेल्या पाटील यांच्या खिशात केवळ ३० रुपये आहेत, शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी जागे व्हावे म्हणून हलगी वाजवत पुण्याला निघालो असल्याचे पाटील सांगत आहेत. हा काही प्रसिद्धी मिळविण्याचा प्रकार नसून जाताना भूक लागली की भाकरी मागून खाणार आहे, साखर कारखानदारांनी शेतकऱ्यावर तशीच वेळ आणली आहे असे देखील पाटील यांनी सांगितले.
हे देखील वाचा : >>


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !