BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ फेब्रु, २०२२

बंडातात्या म्हणजे वारकरी संप्रदायाला लागलेला डाग !

 





मुंबई : ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि राष्ट्रवादी यांच्यात अखेर अपेक्षेप्रमाणे ठिणगी पडली असून बंडातात्या म्हणजे वारकरी संप्रदायाला लागलेला डाग असून तात्याला येरवड्यात उपचाराची गरज आहे अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे  यांनी फटकारले आहे. 


बंडातात्या कराडकर यांनी शासनाच्या वाईन विक्री धोरणाच्या विरोधात आज सातारा येथे आंदोलन केले. यावेळी त्यांनी धक्कादायक आणि वादग्रस्त विधाने केली आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ते सहन करणार नाही हे उघडच होते, शासनाच्या धोरणाबाबत टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे पण त्यांनी राजकीय पक्षांच्या महिला नेत्यांच्या बाबतीत देखील खिल्ली उडवत वादग्रस्त विधाने केली आहेत. राजकीय नेते आणि त्यांची मुले दारू पिऊन पडतात हे सांगताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे, भाजपच्या माजी मंत्री पंकज मुंडे यांची नावे माध्यमांच्या समोर घेतली. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारू पीत नाही त्याचं नाव सांगा असा सवाल पत्रकारांना त्यांनी केला आणि 'पतंगराव कदम यांच्या मुलाचे निधन कसे झाले होते ते विचारा' असे देखील कराडकर म्हणाले. त्यांच्या या विधानाचे पडसाद उमटणार हे स्पष्टच होते आणि त्याप्रमाणे काही वेळेतच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांचे ट्विट आले. 


'महाराष्ट्राच्या महिला लोकप्रतिनिधी व लोकनेत्यांच्या लेकींना 'दारू पिऊन नाचतात' म्हणणारे बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग आहे. तात्याला येरवड्यात उपचाराची गरज ! समस्त महिलांची तात्काळ माफी मागावी अन्यथा खळखट्याक अटळ आहे" असे ट्विट रुपाली पाटील ठोंबरे  यांनी केले आहे. 



  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे उद्धव ठाकरे हे बिघडले असल्याचे विधान केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी यावेळी बोलताना 'ढवळ्या पवळ्या' ची उपमा दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले माणूस आहेत. हिंदूहृदयसम्राट असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र आहेत. दारू आणावी, मंदिरे बंद करावीत, वाऱ्या बंद काराव्यात अशा विचारांचे उद्धव ठाकरे नाहीत पण 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला' अशी अवस्था झाली आहे. अजित पवारांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे बिघडले आहेत असे कराडकर यांनी म्हटले आहे.  यावेळी बोलताना अजित पवार यांनीच दारू विकण्याचा गुण लावला, त्यांनीच मंदिरे खुली करायची नाहीत असे सांगितले असल्याचेही कराडकर म्हणाले. 


कराडकर यांच्या विधानावर वादळ उठण्याची शक्यता असून पहिली ठिणगी रुपाली चाकणकर यांनी टाकली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची नावे घेऊन त्यांनी धक्कादायक विधाने केली आहेत शिवाय ढीगभर पुरावे मिळतील असे देखील सांगितले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस तर हे सहन करणार नाहीच पण सामान्य माणसाला देखील वारकरी संप्रदायातील व्यक्तीकडून अशी विधाने अपेक्षित नाहीत.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !