पंढरपूर : ओमीक्रॉन व्हेरिएंटचे परिणाम हळूहळू सगळीकडेच होताना दिसू लागले असून आता पंढरीचे विठ्ठल मंदिरही रात्री ९ वाजताच भाविकांसाठी बंद होणार आहे.
कोरोनाच्या आक्रमणामुळे विठ्ठल मंदिर जवळपास दीड वर्षे बंदच होते आणि भाविक आणि विठूमाऊली यांच्यात कोरोनाची मोठी भिंत सतत उभी होती. आषाढी कार्तिकी यात्रेसारख्या मोठ्या यात्राही पारंपरिक पद्धतीने झाल्या नाहीत. प्रतीकात्मक यात्रा साजऱ्या कराव्या लागल्या आणि भाविकांना विठूमाऊलीचे दर्शन मिळणे बंद झाले होते. कोरोनाचा प्रभाव कमी होत जाताच भाविकांना विठूमाऊलीचे साजरे स्वरूप डोळा भरून पाहायला मिळाले पण केवळ मुखदर्शन असल्याने लांबुनच भाविकांना समाधान आणावे लागले. मंदिर लवकर सुरु व्हावे ही भाविकांची अपेक्षा होती पण कोरोनाची परिस्थिती ओळखून भाविकांनी देवाचा विरह सहन केला. काहींनी मंदिराच्या नावाने राजकारणही केले पण हे राजकारण ओळखले आणि प्रतीसादही दिला नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत जात असतानाच पुन्हा ओमीक्रॉन या नव्या व्हेरिएंटने झोप उडवली असून शासन हळूहळू एकेक निर्बंध लावू लागले आहे. नुकतेच शासनाने राज्यभर काही निर्बंध लागू केले असताना आता विठ्ठल मंदिर प्रशासनानेही मंदिराच्या संदर्भात दर्शनाच्या वेळेवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथील साई संस्थानने अशाच प्रकारचा निर्णय घेतला असताना आता पंढरपूर विठ्ठल मंदिराबाबतही विठ्ठल मंदिर प्रशासनाच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला आहे. रात्री ९ वाजताच विठ्ठल मंदिर आता भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे.
देशात आणि राज्यात ओमीक्रॉनचा प्रभाव वाढत असल्याने शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यात गर्दी न जमणे याला अधिक महत्व दिले आहे. सद्या नाताळाच्या सुट्ट्यांमुळे पंढरीत गेल्या काही दिवसांपासून गर्दी झाली आहे. त्यात नवीन वर्ष येण्यास चार पाच दिवस शिल्लक आहेत. नववर्षाच्या निमित्ताने विठूमाउलीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राज्यासह सोलापूर जिल्ह्यातही रात्रीची जामावाबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही तसा आदेश काढला आहे. रात्री ९ नंतर मंदिर भाविकांसाठी खुले ठेवल्यास या नियमांचा भंग होणार आहे. त्यामुळे या आदेशाच्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाने रात्री ९ नंतर मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्रीचे ९ वाजण्यापूर्वीच भाविकांना मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे. रात्री ९ वाजता किंवा त्यानंतर येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.
हे वाचाच : >> अक्षता पडण्यापूर्वीच पंढरपूर तालुक्यात रोखला बालविवाह !
वाचा :>> कट्टर शिवसैनिकाने दिला मुख्यमंत्र्यांसाठी आपला जीव !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !