मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर मध्यरात्री अमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे.
शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी आणि मनी लाँड्रिंगचे आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कुठल्याही क्षणी अटक होईल असे चित्र गेल्या दोन महिन्यांपासून स्पष्ट होत होते परंतु अनिल देशमुख हे ईडी अधिकाऱ्यांना उपलब्ध झाले नव्हते. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयीन पातळीवर केलेले प्रयत्न यशस्वी न झाल्याने ते अमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात काल हजर झाले आणि लगेच त्यांची चौकशी सुरु झाली. तेरा तास चौकशी झाल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक होईल अशी चर्चा काल ते हजर झाल्यापासूनच सुरु होती.
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते आणि या आरोपानंतर परमबीर हेच फरार झाले आहेत. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याना अंमलबजावणी संचालनालयाने पाच वेळा समन्स पाठवले परंतु देशमुख हे गायब होते. त्याआधी अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयावर अनेकदा धाड टाकण्यात आली होती. चार पाच वेळा समन्स देऊनही देशमुख हे ईडी कार्यालयात हजर होत नसल्याने त्यांच्या नावाने लूक आउट सर्क्युलर काढण्यात आले होते. अखेर काल सकाळी ११ वाजता ते अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात हजर झाले आणि १३ तासांच्या चौकशीनंतर मध्यरात्री त्यांना अटक केली आहे. ऐन दिवाळीत त्यांना ही अटक झाल्याने त्यांची दिवाळी आता अंधारातच जाणार आहे.
अनिल देस्खामुख यांना आज सकाळी ईडी न्यायालयात हजर केले जाणार असून तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्यापूर्वी त्यांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली होती त्यामुळे मनीलाँड्रिंग प्रकरणातील ही तिसरी अटक ठरली आहे. देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पलांडे आणि कुंदन या दोघांना आधीच अटक झालेली आहे. परमवीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटी वसुलीच्या कथित प्रकरणी पलांडे आणि कुंदन यांच्याविरोधात मोठे पुरावे ईडीच्या हाती लागले असल्याचे सांगितले गेले होते आणि त्याच पुराव्याच्या आधारे या दोघांना अटक करण्यात आली होती.
'तो' पळाला आणि
चौकशी माझी !
काल अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा आपण निर्दोष असल्याचे सांगितले आहे. आपणास जाणीवपूर्वक गुंतवले जात असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला आहे. शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करणारा पळून गेला आहे आणि त्यासाठी माझी चौकशी होत आहे असे त्यांनी म्हटले आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे याचे मला दुःख आहे. तीस वर्षांच्या सामाजिक राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप झालेला नाही, सरळ मार्गाने आणि नैतिकतेला धरून चालणारा मी व्यक्ती आहे. परमवीरसिंग देश सोडून पळून गेला आणि अनेकदा तुरुंगात जाऊन आलेला आणि सद्या खुनाच्या आरोपात तुरुंगात असलेल्या सचिन वाझे यांच्या आरोपावरून माझी ईडी, सीबीआय चौकशी सुरु आहे ही दुःखाची बाब आहे असे अनिल देशमुख यांनी म्हटले.
माझ्यावर खोटे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज कोठे आहेत ? प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांनुसार ते भारतातून पळून परदेशात गेले आहेत. त्यांच्याविरोधात राज्यातील अनेक अधिकारी आणि व्यावसायिक यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. आरोप करणारच पळून गेला आहे आणि त्याच्या आरोपावरून माझा छळ केला जात आहे असेही देशमुख यांनी म्हटले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !