पंढरपूर : अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीसह पत्नीचाही खून करून पळालेला नराधम अखेर पंढरीच्या वारीत सापडला असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे ८ नोव्हेंबर रोजी ही भयावह, अमानुष घटना घडली होती. तेरा वर्षे वयाची श्रुती आणि तिची पस्तीस वर्षांची आई लक्ष्मी माने या दोघीची राहत्या घरात अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. दोघींना रक्ताच्या थारोळ्यात टाकून मयत लक्ष्मी माने यांचे पती आणि श्रुतीचा पिता आण्णा भास्कर माने हा मात्र दुचाकीवरून पळून गेला होता त्यामुळे त्यानेच हे खून केल्याची शक्यता बळावली होती. रात्री जेवण केल्यानंतर आण्णा माने याने पत्नी लक्ष्मी, मुलगी श्रुती आणि मुलगा रोहित याला यांना झोपण्यासाठी एकाच खोलीत बोलावले होते पण फक्त रोहित त्या खोलीत न जाता आपल्या आजीजवळ जाऊन झोपला होता. सकाळी मात्र दोघीही मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.
संशयित आरोपी आण्णा माने हा घटनेदिवशी सकाळी दुचाकीवरून पसार झाला होता, पोलीस त्याच्या मागावर होते आणि तो थेट पंढरीच्या वारीत पोलिसांच्या हाती लागला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी त्याला पंढरीत तुकाराम भवन परिसरात पकडले आणि बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या या यशाचे कौतुक होत आहे. अवघी पंढरी आणि पोलीस यंत्रणा वारीच्या बंदोबस्तात व्यस्त असतानाही लाखोंच्या गर्दीत या नराधमावर पोलिसांनी लक्ष ठेवले ही कौतुकाचीच बाब मानली जात आहे. कार्तिकी यात्रेचा सोहळा आणि विठ्ठल मंदिर परिसर यातून आरोपीला शोधणे हे तसे आव्हानात्मक काम होते. करमाळा पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी तीन पथके तयार केली होती. आरोपीचे छायाचित्र, दुचाकीचा क्रमांक अशी सगळी माहिती व्हाटस ऍप ग्रुपवरून पाठविण्यात आली होती, त्यानुसार पंढरपूर पोलीस सतर्क होते. वारीच्या गर्दीतही गुन्हे प्रकटीकरण शाखेला या आरोपीची माहिती मिळाली आणि पोलिसांनी जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. या कामगिरीबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि अन्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
मुलाने पहिले म्हणून ---
करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे ८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात हादरा बसला होता. सकाळी आपले वडील दुचाकीवरून निघालेले आणि त्याचे कपडे रक्ताने माखलेले असल्याचे आरोपीच्या मुलानेच पहिले होते. आजीजवळ झोपलेला पंधरा वर्षे वयाचा रोहित माने हा वडील आण्णा माने याच्या दुचाकीचा आवाज झाल्याने जागा झाला. एवढ्या लवकर वडिलांच्या गाडीचा आवाज कसा आला म्हणून रोहितने पहिले असता वडील आण्णा माने याच्या अंगावरील कपड्यावर रक्ताचे डाग दिसले. आण्णा माने तेथून पसार झाला पण रोहित हा प्रकार पाहून मोठ्याने ओरडू लागला. नक्की काय झालेय हे त्याला माहित नव्हते पण वडिलांच्या कपड्यावरील रक्ताचे डाग पाहून मात्र काहीतरी अघटित घडल्याचा त्याला अंदाज आलेला होता. दरम्यान त्याच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमा झाले.
जमलेल्या लोकांनी खोलीत जाऊन पहिले असता चिमुकली श्रुती आणि तिची आई रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली असल्याचे त्यांना पाहायला मिळाले आणि सर्वाना धक्काच बसला. घाईघाईने पळून गेलेल्या आण्णा माने यानेच हे दोन खून केले असल्याचे दिसून येत होते. आरोपीने रात्रीच्या वेळेलाच हे दोन खून केले असून त्यांचे मृतदेह रात्रीपासून रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आण्णा माने हा पसार झाल्याने त्यानेच हे दोन्ही खून केले असल्याचा संशय गडद झाला. हा अमानुष प्रकार कशासाठी केला हे कोणालाच समजू शकले नव्हते, त्याचा आता उलगडा होणार आहे.
रोहित वाचला !
आरोपीला संपूर्ण कुटुंब संपवून टाकायचे होते, रात्रीच्या जेवणानंतर पत्नी, श्रुती आणि रोहित या सर्वाना आण्णा माने याने एका खोलीत झोपायला सांगितले होते. त्याच्या सांगण्यावरून श्रुती आणि तिची आई त्या खोलीत झोपली. पंधरा वर्षे वयाचा रोहित मात्र या खोलीत न जातात आपल्या आजीजवळ झोपला म्हणून त्याचा जीव वाचला अन्यथा या नराधमाने त्यालाही रक्ताच्या थारोळ्यात झोपवले असते आणि दोघांसह त्याचाही प्राण गेला असता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !