शोध न्यूज : कुणाच्याही वाट्याला येऊ नये असा मृत्यू मळणी यंत्र चालकाच्या वाट्याला आला असून या यंत्रात अडकून शीर वेगळे आणि धड वेगळे अशी त्याची अवस्था झाली.
मृत्यू अटळ असला तरी तो अवेळी आणि वाईट पद्धतीने येऊ नये असे सर्वांनाच वाटत असते. तरीही अपघातात येणारे मृत्यू हे अत्यंत भयानक असतात आणि ते कुणाच्या हातातही नसते. मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे असून हे सर्व मृत्यू या भयानक गटात मोडतात. मळणी यंत्रावर काम करीत असलेल्या महिलांच्या साडीचे पदर अडकून दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत. अशा घटनात धडापासून शीर वेगळे होण्याच्या घटना अधिक घडलेल्या आहेत. आता पुन्हा अशाच पद्धतीची भयानक घटना घडली असून भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथे मळणी यंत्र चालकाचाच भयानक मृत्यू झाला आहे.
खरीपातील सोयाबीन काढण्याचा हंगाम सद्या सुरु असून बाभूळगाव येथील संदीप सुधाकर गाढे हे मळणीची कामे करीत होते. त्यांचाकडे मळणीयंत्र असल्यामुळे ते हे यंत्र घेवून मिळेल तेथे काम करीत होते. गावाच्या शेजारीच असलेल्या लिंगेवाडी येथील सदाशिव साबळे यांच्या शेतात मळणीच्या कामासाठी ते गेले होते. मळणीयंत्राद्वारे सोयाबीन काढले जात असताना या यंत्रात काही बिघाड झाला. सुरु असलेले काम बंद पडले म्हणून गाढे यांनी तातडीने हालचाली सुरु केल्या. मळणीयंत्र दुरुस्त करण्यासाठी आवश्यक दुरुस्तीचे साहित्य घेवून तो शेतात आला.
मळणी यंत्र दुरुस्तीचे काम त्यांनी हाती घेतले आणि मळणी यंत्र सुरु करून तो काही काम करू लागला. याच वेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट मळणी यंत्रात ओढले गेले. हा प्रकार आजूबाजूच्या लोकांना दिसला आणि त्यांनी धावत जाऊन मळणी यंत्र बंद केले पण तो पर्यंत मळणी यंत्र रक्ताने माखले होते. चालकाचे डोके त्याच्या शरीरापासून वेगळे झाले होते. (Terrible death! Head and torso separated) अत्यंत भयानक मृत्यू त्याच्या वाट्याला आला होता. हा सर्व प्रकार अगदी काही क्षणात घडून गेला होता. जवळपास लोक असताना देखील त्याला दवाखान्यात नेण्याची आणि उपचार करण्याची वेळच दिला गेला नाही. एका क्षणात मळणी यंत्राने शीर आणि धड वेगळे करून टाकले होते.
नशिबाचा उलटा फेरा !
कष्ट करून आपल्या कुटुंबाची देखभाल करणाऱ्या संदीप यांच्या नशिबाचा फेराच उलटा फिरला. संदीप यांनी आधी शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी ते प्रचंड परिश्रम घेत होते आणि त्यांचा हा व्यवसाय चांगला सुरु झाला होता. अचानक एके दिवशी त्यांचा सर्व शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आणि हा व्यवसाय बंद पडला. आई वडील, पत्नी, मुलगा असा परिवार असलेल्या संदीपला दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागणार होता. त्याने मळणी यंत्र घेतले आणि त्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका करणे सुरु केले होते. या मळणीयंत्रानेही अशा प्रकारे दगा दिला आणि त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !