BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ सप्टें, २०२२

शिवसेनेच्या शरद कोळी यांनी काढले शहाजीबापुंचे वाभाडे !

 


शोध न्यूज : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे कुटुंबावर टीका केल्यापासून शिवसेनेने त्यांना थेट टार्गेट करायला सुरुवात केली असून शरद कोळी यांनी तर आ. पाटील यांचे वाभाडेच काढले आहेत. 


शिवसेनेतून फुटून चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले पण काही मोजके आमदार शिवसेनेच्या टार्गेटवर आहेत. त्यात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे अग्रक्रमावर आलेले दिसत आहेत. बंडखोरीनंतर बहुतेक आमदार शांत आणि मौन बाळगून आहेत पण शहाजीबापू पाटील यांनी मात्र टीकेचा धडाकाच लावला आहे.  यापूर्वी सांगोल्याच्या पलीकडे काही न बोलणारे बापू आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका करीत सुटले आहेत. त्यामुळेच शिवसेना अधिक खवळली असून आता ही टीका पातळी सोडून देखील होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यात युवा सेनेने रास्त रोको केला आणि यावेळी झळकावलेले बॅनर अगदी टोकाचे होते. 


'बिन अकलेचे गाढव' 'दारुडा' अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करून आ. शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका झोडण्यात आली. याची चर्चा राज्यभर सुरु असताना आता शिवसेनेचे शरद कोळी यांनी त्याही पलीकडे जाऊन शहाजीबापू यांचे वाभाडे काढले आहेत. 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... समदं ओक्के' हा संवाद बहुचर्चित ठरला आणि शहाजीबापूनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली पण हे सगळे बुमरँग बापूंवरच उलटताना दिसू लागले आहे. मर्यादेच्या पलीकडे होणारी टीका सहन करण्याची वेळ आता शहाजीबापू यांच्यावर आली असल्याचे दिसत आहे. 'उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याना सांगोल्यात भाड्याने बंगले घेऊन देतो' हे शहाजीबापू यांचे विधान त्यांच्या अंगावर उलटू लागले आहे. 


शिवसेनेचे शरद कोळी यांनी सोलापुरात बापूंवर अत्यंत जळजळीत टीका केली आहे 'बायकोला लुगडं घ्यायला शहाजीबापूकडे पैसे नाहीत असं ते सांगतात, एवढेच नव्हे तर, हातभट्टी दारू पिल्यावर त्याचं बिल सुद्धा दुसऱ्याला भरायला लावतात, ते शहाजीबापू उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याना काय घर देणार ? असा सवाल कोळी यांनी केला. आमदार होण्यापूर्वी शहाजीबापू मातोश्रीसमोर नाक घासत होते, याचा विसर त्यांना पडलेला दिसतो आहे. शहाजी पाटलांनी त्यांची वायफळ बडबड बंद करावी नाहीतर तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा कोळी यांनी दिला. 


  • आ. शहाजीबापू हे 'संत्रा' पिऊन बोलतात की हातभट्टीवरील 'तांब्या' मारून बोलतात, नेमकं तेच कळत नाही - शरद कोळी 


आ. शहाजीबापू पाटील यांनी भानावर यायला पाहिजे, यापुढे जर तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्धल एकेरी भाषेत बोलाल तर याद राख, तुम्हाला जशास तसे उत्तर तर दिले जाईलच पण यापुढे जर बोललात तर तुमच्या घरावर एक वेगळ्या पद्धतीचा मोर्चा काढला जाईल आणि तुमचे तोंड कायमचे बंद केले जाईल. याची आपण खबरदारी घ्यावी. त्यांनी घेतलेले पन्नास खोकी सुरक्षित जागी ठेवून जनतेला वेड्यात काढण्याचे काम सुरु केले आहे. (Shiv Sena's Sharad Koli's venomous criticism of MLA Shahjibapu Patil) अशा शब्दात शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. 


आता उत्तर काय ?

एवढी जळजळीत टीका झाल्यावर शांत बसणारे आ. शहाजीबापू पाटील हे नक्कीच नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून देखील 'माणदेशी' प्रहार होण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या टीकेला बापू आता कसे उत्तर देतात याकडे लक्ष लागलेले आहे. बापू उत्तर देतात की आता उठलेल्या या वादळाकडे दुर्लक्ष करीत जनतेच्या कामात व्यस्त राहतात हे दिसेलच !  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !