BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ मे, २०२२

विधवा प्रथा बंद करण्याचा शासनाचा मोठा निर्णय !

 



मुंबई : विधवा प्रथा बंद करण्याचा एक आदर्श आणि मोठा निर्णय महाविकास आघाडीच्या शासनाने घेतला असून याचे कौतुक होऊ लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने ठराव केल्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 


विज्ञानयुगाने प्रगती केली असली तरी अजूनही काही रूढी परंपरा जपल्या जातात, त्यातीलच एक विधवा प्रथा असून काहीही चूक  नसताना विधवेला आयुष्यभर शिक्षा भोगावी लागते. याच समाजाचा घटक असून देखील तिला वेगळी वागणूक दिली जाते आणि सर्व सन्मानापासून तिला वंचित ठेवले जाते. विधवेवर समाजाची अनेक बंधने आजही कायम असून तिला सामाजिक न्याय नाकारला जातो. पतीच्या निधनानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले जाते, कपाळावरील कुंकू पुसले जाते, पायाच्या बोटातील जोडावी काढली जातात, बांगड्या फोडल्या जातात आणि संपूर्ण आयुष्यभर तिला सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात मागे ठेवले जाते. पूर्वी पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जाण्याची अनिष्ठ प्रथा होती परंतु ती बंद झाली तथापि विधवेला मात्र जिवंत राहून देखील मरणयातना सोसाव्या लागतात ही आजची स्थिती आहे. 


पतीचे निधन होणे यात पत्नीची काहीच चूक नसताना तिच्या आयुष्यात मात्र तिला वेगळी वागणूक दिली जाते. तिचे सगळे सन्मान हिरावून घेतले जातात. तिच्या हक्कावरच गदा आणली जाते आणि विधवा देखील तक्रार न करता हे सगळे मान्य करीत जगत असते. विधवेने असेच जगायचे असते अशी मानसिकताच तयार झालेली असते पण त्यामुळे विधवा महिलेला आयुष्यभर सन्मानापासून वंचित राहावे लागते. नकळतपणे समाजाची अनेक बंधने तिच्यावर लादली जात असतात. अलीकडी काळात विधवा पुनर्विवाह मान्य होऊ लागले आहेत पण विधवांना सन्मान मात्र मिळत नाही. आणि तिच्या हक्काकडे समाजाचे देखील लक्ष कधी जात नाही त्यामुळे वर्षानुवर्षे ही अनुचित परंपरा तशीच पुढे जात राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामस्थांनी एकत्र येत याबाबत निर्णय घेत गावातील विधवा प्रथा नुकतीच बंद करण्यात आली आहे. 


शासनाचा पुढाकार !

हेरवाड गावाचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच आता शासनानेच पुढाकार घेतला आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने या गावची दखल घेत एक परिपत्रक जारी केले आहे आणि राज्यातील सर्व ग्रामपंचायतीने हेरवाडचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आहे. 


परिवर्तनाचे पाऊल !

मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने हेरवाड ग्रामस्थांनी पाउल टाकत विधवा प्रथा बंद करण्यासाठीचा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. वास्तविक असा ठराव मंजूर करण्याचीही आवश्यकता नाही परंतु ही भूमिका आणि त्याला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त व्हावे यासाठी ग्रामपंचायत ठराव मंजूर करण्यात आला आहे.  संपूर्ण गावाने मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले असून अन्य गावांना देखील यामुळे संदेश देण्यात आला आहे. (Widow method closed villagers good decision) गावोगाव असा निर्णय घेतला तर विधवांच्या वटलेल्या जीवनात देखील पुन्हा पालवी फुटण्यास मदत होईल. 


सन्मानाने जगण्याचा हक्क !

विधवांना देखील समाजात सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, पण विधवा झाल्यावर तिच्याकडून समानतेचे हक्क हिरावून घेतले जातात आणि आयुष्यभर तिच्यावर अन्याय होतो. हे घडू नये यासाठीच हा निर्णय घेतला असून कायदेशीर अधिष्ठान प्राप्त होण्यासाठीच ठराव मजूर करण्यात आला आणि या गावात याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे. आता याच गावाचा आदर्श राज्यातील सर्व ग्रामपंचायतीने घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे.


हे देखील वाचा : >>






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !