BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ मार्च, २०२२

एप्रिल महिन्यासाठी हवामान विभागाचा 'कडक' इशारा !

 


मुंबई : राज्यातील तापमान वाढले असतानाच संपूर्ण एप्रिल महिन्यासाठी हवामान विभागाने कडक इशारा दिला असून एप्रिलमध्ये उन्हाळा प्रचंड कडक असणार आहे त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे.


अवकाळी पावसाने राज्याला तडाखा दिल्यानंतर आता राज्यात उष्णतेची लाट आली असून दोन शेतकऱ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशा घटनामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढवली आहे. उद्यापासून एप्रिल महिना सुरु होत आहे आणि कडक उन्हाळ्याचा मे महिना अजून यायचा आहे. तोच उन्हाची तीव्रता वाढत निघाली असून उन्हाचे जोरदार चटके बसू लागले आहेत. सद्याच्याच उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असताना एप्रिल महिना अत्यंत कडक उन्हाळ्याचा असणार आहे असा इशाराच हवामान विभागाने ( Summer Forecast in Maharashtra)  दिला आहे. 


एप्रिल महिन्यात राज्यातील किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहील. उन्हाळा अधिक तीव्र होणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात पाउसही सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  एप्रिल महिन्यात तापमान वाढलेले दिसणार असून ते सरासरीपेक्षा अधिक असणार आहे.  उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील दोन महिने हे त्रासाचे आणि उन्हाच्या तीव्रतेचे जाणार असल्याचे दिसत आहे. 


पावसाचाही अंदाज 

उन्हाळा कडक असण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत तसे यंदा येणारा पावसाळा देखील चांगला असणार असल्याचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने याआधीच पावसाचा अंदाज व्यक्त केला असून देशात तसे महाराष्ट्रात मुबलक पाउस होणार असल्याचे सांगितले आहे. आता भारतीय हवामान विभागाने देखील तसाच अंदाज व्यक्त केला असून एप्रिल महिन्यात  कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.  यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिला आहे.  


तापामान वाढणार 

सद्या उष्णतेची लाट असल्यामुळे राज्यातील तापमान वाढलेले असून आणखी दोन तीन दिवस ही लाट कायम राहील असे सांगितले जात असतानाच आता एप्रिल महिना कडक उन्हाळ्याचा असणार आहे त्यामुळे यंदाचा उन्हाळा संपेपर्यंत तापमानात सतत वाढच होत जाणार आहे असे संकेत स्पष्ट झाले आहेत. उष्णतेची लाट सुरु होताच राज्यात दोन शेतकऱ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे चिंता वाढताना दिसत आहे. 


शेतकऱ्याचा मृत्यू !
उष्णता वाढू लागताच जळगाव येथील तरुण शेतकऱ्याचा उष्माघाताने नुकताच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावाचे रहिवासी असणारे जितेंद्र संजय माळी या ३३ वर्षीय शेतकऱ्यास शेतात भर उन्हात काम केल्यानंतर उष्माघाताचा त्रास झाला आणि  शेतातून घरी येत असताना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला. 


अकोला येथेही बळी !
उष्माघाताने अकोला येथे आणखी एका शेतकऱ्याचा बळी घेतला असल्याने तर अधिक चिंता व्यक्त होऊ लागली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही येथील एका पन्नास वर्षे वयाच्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू होण्याची घटना घडली आहे.  समाधान शामराव शिंदे या शेतकऱ्यास उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 



दक्षता घेण्याचे आवाहन !
सद्या सर्वत्रच तापमान वाढलेले असून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. शक्यतो घराबाहेर न पडणेच अधिक चांगले ठरणार आहे परंतु जावे लागलेच तरी अधिक काळ उन्हात थांबू नये तसेच उन्हापासून संरक्षण करण्याचे उपाय करण्यात यावेत. शिवाय दिवसभर जास्तीत जास्त पाणी प्यावे असे डॉक्टर देखील सांगू लागले आहेत. वाढत्या तापमानात ही दक्षता घेणे आवश्यक बनले आहे.  


हे देखील वाचा :


अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !

   

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !