शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील आणखी कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यातील तीन कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आणि आवश्यक असलेली काही कृषी केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडताना नेहमीच दिसतात. बोगस खते, बियाणे, औषधे विकून पैसा मिळवण्याच्या मोहात अनेक शेतकरी अडचणीत येतात आणि त्यांचे प्रचंड नुकसान होते. अनेक कृषी केंद्रे शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेली असताना काही केंद्रावर असे गैरप्रकार होताना दिसतात. कृषी विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होते परंतु तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असते. नुकतेच पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एका कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे आणि आता सोलापूर जिल्ह्यातील तीन कृषी केंद्राचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहेत.
कृषी केंद्रात ग्राहकास दिलेस अशा पद्धतीने दर्शनी भागात भाव फलक लावलेला नाही, किटकनाशकाचा साठा किती आहे हे नमूद करण्यात आले नाही, शेतकऱ्यांना दिलेल्या बिलावर औषध कंपनीचे नाव, पॅकिंग प्रकार, बॅच, उत्पादनाची तारीख, मुदत व किंमत नमूद केले नाही. विक्री परवान्यास मान्यता नसलेली उत्पादने विक्रीस ठेवणे असे प्रकार दुकान तपासणीत आढळून आले आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तीन कृषी केंद्राचे परवाने पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. यात मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील विठ्ठल कृषी केंद्र, माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील कलाशंकर कृषी केंद्र आणि महाविर ट्रेडिंग कंपनी माळशिरस या तीन कृषी दुकानांचा समावेश आहे. मॉडर्न ऍग्रीजेनेटिक्स या किटकनाशक पुरवठा करणाऱ्या पुरवठाधारकाचे प्रमाणपत्र मंजूर नसताना विक्री करीत असल्याने कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यांमध्ये विक्रीचा परवाना नसलेले मॉडर्न ऍग्रीजेनेटिक लिमिटेड कंपनीचे 'ग्लायफोसेट ४१' तणनाशक विकले जात असल्याचे कृषी विभागाच्या तपासणी पथकास आढळून आले. यामुळे पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एका कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Licenses of three agricultural centers in Solapur district suspended) त्यानंतर आता तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत त्यामुळे कृषी केंद्र चालकात खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !