BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ ऑग, २०२२

खोटे अंगठे, खोटे मजूर, आठ जणांवर गुन्हा दाखल !

 



पंढरपूर : शासनाच्या वृक्षलागवड योजनेत खोट्या सह्या, बोगस अंगठे खोटेच मजूर आणि बनावट कागदपत्र याच्या आधारे सव्वा कोटींचा अपहर केल्याप्रकरणी अखेर पंढरपूर पोलिसात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम नेहमीच वादात अडकला आहे, भारतीय जनता पक्षावर या योज़नेबाबत सतत टीका होत आली आहे. वृक्ष लागवड योजनेसाठी सरकारचा प्रचंड पैसे खर्च होतो पण दरवर्षी लावलेल्या झाडांचे आस्तित्व कुठे दिसत नाही. कागदावरील झाडे आणि प्रत्यक्षात असलेली झाडे यांचा कुठेच ताळमेळ लागत नाही त्यामुळे या योजनेत मोठा गैरप्रकार असल्याचे आरोप होत असतात. राज्याच्या अनेक तालुक्यात असे आरोप होत असतात पण त्याची चौकशीही होताना दिसत नाही. पंढरपूर तालुक्यात देखील असाच गैरप्रकार झाल्याची तक्रार आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी केली आणि तिचा पाठपुरावा देखील केला. सन २०२९-२० मध्ये महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात सव्वा कोटींचा अपहार करण्यात आल्याचा चव्हाण  यांचा आरोप आहे. 


खोटेच मजूर, खोटे अंगठे आणि सह्या तसेच खोटी कागदपत्रे तयार करून वृक्ष लागवड योजनेत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा अपहार केला असल्याची दादासाहेब चव्हाण यांची तक्रार आहे.  न्यायालयाच्या आदेशानंतर आता वनरक्षक संतोष महालिंग नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर सुभाष अहिरे, वनमजूर आंबन्ना सिद्राम जेऊरे आणि अन्य पाच जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सामाजिक वनीकरण विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांसह आठ जणांनी मिळून खोटी कागदपत्रे तयार करून बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने १ कोटी २५ लाख रुपये हडप केले असल्याबाबत आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशी करण्याचे आदेश पंढरपूर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी दिले होते त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 


राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम  २०१९-२० मध्ये राबविला होता. या उपक्रमांतर्गत पंढरपूर शहर आणि तालुक्यात प्रमुख रस्ते, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात शासनाच्या नियमाप्रमाणे हा उपक्रम राबविण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.  सदर उपक्रम राबविताना तत्कालीन वनरक्षक संतोष नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर अहिरे, वनमजूर अंबन्ना जेऊरे यांनी संगनमत करून नियोजनाच्या अर्धवट झाडांची लागवड केली. या कामांसाठी काही मजूर दाखवले पण प्रत्यक्षात हे मजूर कामावर नव्हतेच परंतु त्यांच्या नावाने हा अपघात करण्यात आल्याचा आरोप आहे. 


अभिजित गायकवाड, प्रवीण जाधव, लक्ष्मण साळवी, जयसिंग नागणे, अनिल गायकवाड, मयूर गायकवाड, राणी गायकवाड, प्रताप गायकवाड, वनिता दानवले, स्वाती दानवले यांना बनावट मजूर दाखवून त्यांच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली आणि प्रत्यक्षात त्यांच्या सह्या न घेताना बनावट अंगठे उठवून, बोगस सह्या करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप दादासाहेब चव्हाण यांनी केला आहे. (Fraud in tree planting in Pandharpur taluka) चव्हाण यांनी पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे तक्रार दाखल केली गेली नसल्याचे त्यांनी न्यायालयात धाव घेतली.  पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश आता पोलिसांना दिला आहे. 


न्यायालयाच्या आदेशानुसार पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून झाडांच्या लागवडीत तब्ब्ल सव्वा कोटींचा अपघात केल्याचा आरोप असल्याने खळबळ उडाली आहे. (Fake thumbs, fake laborers, case registered against eight employees) दरवर्षी वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात येतो त्यामुळे यापूर्वी देखील असे प्रकार झाले आहेत काय ? याचीही चौकशी करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. 


अखेर  गुन्हा दाखल  ...!

आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला, त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी याबाबत टाळाटाळ केली असल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी रजिस्टर पोस्टाने पोलिसांना तक्रार दिली परंतु तरीही पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने विविध कलमान्वये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश बजावले आणि त्यानुसार आता गुन्हा दाखल झाला आहे.    

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !