पंढरपूर ( फिरोज शेख ) : भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील मुस्लीम बांधवानी विराट मोर्चा काढला.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचे प्रकरण देशभर आणि देशाच्या बाहेरही तापलेले आहे. देशात आणि महाराष्ट्रात मुस्लीम बांधवांचे विराट आणि अतिविराट मोर्चे निघत आहेत. नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्याविषयी प्रचंड संताप व्यक्त होत असून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. देशभरातील मुस्लीम समाज आक्रमक झालेला असून नुपूर शर्माच्या वक्तव्याचा मुस्लीम देशांनीही निषेध व्यक्त केला आहे. (Muslim Samaj Morcha at Pandharpur)भारतीय जनता पक्षाने केवळ त्यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.
सदर प्रकरणी कारवाई करण्यासाठी राज्यभर मोर्चे निघाले असून नुकताच सोलापूर येथे मुस्लीम समाजाचा भव्य मोर्चा निघाला होता आणि आज पंढरपूर येथे निघालेल्या भव्य मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पंढरपूर तालुका व शहर मुस्लीम समाज आणि स्टेशन मस्जिद यांच्या वतीने पंढरपूर शहरातून आज जंगी मोर्चा काढण्यात आला. नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी करीत हा मोर्चा पंढरपूर तहसील कार्यालयावर धडकला आणि आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात ऍड यासिन शेख, नगरसेवक बोहरी, डॉ. आरिफ बोहरी, मोहम्मद वस्ताद, फारुख बागवान, बशीर तांबोळी, इन केबल्सचे फिरोज शेख, स्टेशन मस्जिद यंग पार्टीचे जावेद शेख, अमीर खान , मस्जिद शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
तातडीने अटक करा
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या नुपूर शर्मा तसेच सहभागी असलेल्या सर्वाना तातडीने अटक करावी, त्यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दंगल पेटवण्याचा प्रयत्न
हिंदू मुस्लिम एकोप्याने राहत असून दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करीत आहेत. मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अनुद्गार काढून त्यांनी मुस्लिम समाजाचा भावना भडकावून दंगल पेटविण्याची प्रयत्न केला आहे अशा प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अलीकडं जे वारंवार मुस्लिम समाजाच्या विषयी बोलून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा व्यक्तींना पायबंद घालण्यासाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती करून देशात शांतता अबाधित राहील असा पर्यंत झाला पाहिजे असे यावेळी बोलताना ऍड यासीन शेख यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !