वर्धा : एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या विकेश नगराळे याला फाशी देण्याची मागणी झाली असली तरी या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारी २०२० रोजी विकेश नगराळे या नराधमाने एकतर्फी प्रेमातून तरुण प्राध्यापिकेस जिवंत पेटवून जाळून मारले होते. शिक्षिकेस पेटविल्याने ती भाजून गंभीररित्या जखमी झाली होती. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाने राज्यभरात अस्वस्थता निमाण केली होती आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सगळीकडे होताना दिसत होती. मातोश्री आशाताई कुणावर महिला महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या तरुण प्राध्यापिकेच्या अशा करुण अंतामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी नगराळे याला दोषी धरले आहे. त्याच्या शिक्षेवर आज न्यायालयाने निकाल दिला असून विकेश उर्फ विक्की नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ऍड उज्वल निकम यांनी नियुक्ती करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी निकेश नगराळे याच्या विरोधात ४२६ पानी दोषारोप पात्र हिंगणघाट प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते आणि या खटल्यात २९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदण्यात आल्या आहेत. जलद गती न्यायालयात हा खटला वर्ग केलेला असताना देखील या खटल्याची सुनावणी पूर्ण होण्यास दोन वर्षाचा कालावधी लागला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपून न्यायालयाने आरोपी नगराळे हा दोषी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज न्यायालयाने आरोपीची शिक्षा सांगितली.
भर रस्त्यावर आरोपीने या तरुण प्राध्यापिकेस जिवंत जाळल्यामुळे राज्यात चिंता आणि संताप व्यक्त करण्यात आला होता. विद्यार्थिनी आणि महिला यांच्यात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या खटल्यात नोंदविण्यात आलेल्या २९ साक्षीदाराच्या साक्षी झाल्या असून यातील एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. आरोपीवरील आरोप सिद्ध होण्याएवढे भक्कम पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते. सुनावणीवेळी आपल्यावरील आरोप नगराळे याने फेटाळून लावले होते. सदर आरोप खोटे असून आपण कोणतेही जळीत हत्याकांडाचे कृत्य केलेले नाही असे आरोपीने न्यायालयाला सांगितले होते परंतु भक्कम पुरावे असल्याने न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि आज शिक्षा ठोठावण्यात आली.
आरोपीने आरोप फेटाळले असले तरी न्यायालयासमोर आलेल्या मजबूत पुराव्याच्या आधाराने न्यायालयाने आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्याचे म्हटले होते. हे जळीत हत्याकांड अत्यंत अमानुष आणि क्रूर होते त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षाच व्हावी अशी अपेक्षा आणि मागणीही राज्यभरातून होत होती. या खटल्याचा निकाल लवकर लागावा अशी अपेक्षा व्यक्त होत होती पण सुनावणीस तब्बल दोन वर्षे गेली आहेत. आता आज हा निकाल आला आणि नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही अपेक्षा फोल ठरली.
हे देखील वाचा >>
पंढरीत पोलिसावर तलवार हल्ला : चौघांना पोलीस कोठडी !
पंढरपूर शहरात तरुणीने घेतला गळफास !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !