BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२४

पंढरपूर तालुका हादरला ! तीन शाळकरी मुलांचा बुडून झाला मृत्यू !



शोध  न्यूज : पंढरपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच हृदयद्रावक बातमी समोर आली असून एका शेततळ्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनने सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे.


पंढरपूर तालुक्यातील यादुर्दैवी घटनेत दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. काल शनिवारी रात्री ही घटना समोर आली आणि करकंब परिसर शोकसागरात बुडाला आहे. करकंब शहराच्या जवळच मोडनिंब रस्त्याच्या बाजूला असलेल्या परदेशी यांच्या शेतातील तळ्यात ही घटना घडली. या शेतातील पाण्याच्या  टँकमध्ये तीन शाळकरी मुले पडली असल्याची माहिती करकंब येथे पोहोचली आणि करकंब येथील नागरिक तसेच पोलीस धावत घटनास्थळी गेले. परिस्थितीचे गांभीर्य पोलिसांना होते त्यामुळे त्यांनी तातडीने या पाण्यात सदर मुलांचा शोध घेणे सुरु केले. (Three school children drowned in Pandharpur taluka) काही काळ ही शोधमोहीम सुरु ठेवली असता, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तीनही मुलांचे मृतदेह हाती लागले. अकरा वर्षाचे वय असलेला मनोज अंकुश पवार आणि  गणेश नितीन मुरकुंडे (७), हर्षवर्धन नितीन मुरकुंडे (९)  या भावंडांचा या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले.


पाण्यातून मृतदेह बाहेर काढले तेंव्हा गावकरी निशब्द झाले होते तर मुलांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. आकांत आणि आक्रोश यामुळे वातावरण भेदून गेलेले होते. लहानशी चिमुकली तीन  मुले पाण्यात बुडून  मृत्युमुखी पडल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. सदरची मुले पाण्यात कशी पडली याबाबत काहीही माहिती मिळत नव्हती. खेळायला गेलेली मुले सायंकाळ झाली तरी देखील घरी परत आलेली नव्हती, मुले घरी न परतल्याने घरात चिंता व्यक्त होत होती. अखेर या मुलांचा शोध सुरु केला गेला आणि त्यानंतर या तिन्ही मुलांचे मृतदेह हाती लागले. पाण्यातून बाहेर काढलेल्या मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !